कोकणात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रुढी, प्रथा, परंपरा अजूनही त्याच पद्धतीत राबवल्या जातात. अशीच एक प्रथा म्हणजे गावपळण.
कोकणातील काही गावांमध्ये पुर्वजांनी सुरू केलेली गावपळण ही प्रथा अजूनही काही बदल न करता तशीच सुरू आहे.
काय असते ही गावपळण? कुठे होते? का करतात? असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते. मागच्या ३-४ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या चिंदर या गावी ही प्रथा होते असे मी ऐकून होतो. पण नेमकं कधी होते हे माहीत नव्हतं. पण यावर्षी गावपळणच्या ठिक दोन दिवस आधी ही गावपळण कधी होणार आणि कुठे होणार हे समजलं. मग त्यादिवशी तिथे जाण्याचं ठरलं. पण तरीही तिथे गेल्यावर काय अनुभवायला मिळेल, गाव बंद असेल तर भेटायचे कोणाला, सर्व लोक कुठे भेटतील, बाहेरच्यांना गावात घेतील कि नाही असे सर्व प्रश्न समोर होते. म्हणून चिंदर गावातील कुणी कुणाच्या ओळखीचं भेटतो का याची शोधाशोध सुरू झाली. सोशल मीडियामुळे जग तसं जवळ झालं आहे.
काही संपर्क मिळाले, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी संध्याकाळी चिंदर गावच्या रामेश्वर मंदिरात पोहोचलो. पण मला कदाचित उशीर झाला होता. कारण मी जाईपर्यंत पुर्ण गाव रिकामी झालं होतं. सर्व घरं बंद होती. सर्व दरवाजे कुलुपबंद, रस्त्यावर एकही मनुष्य नाही. मंदिरात सुद्धा कोणी नव्हतं. आजुबाजुला तीन मंदिरं आहेत, पण कुठेच कोणी दिसत नव्हतं. शेवटी अर्धा तास शोधाशोध करुन झाल्यावर एक व्यक्ती भेटली. तीसुद्धा घाईघाईत बॅग घेऊन स्कुटर वरुन निघणार होती. त्यांना विचारलं सर्व गाव वाले कुठे आहेत. तर म्हणाले "आता गावत कोण नाय भेटाचो, सगळा वशाड पडला अस्तला आता." म्हणजे आता गावात कोणी नाही भेटणार, सर्व ओसाड पडलं असणार. ते म्हणाले माझ्या बरोबर चला, मी दाखवतो, मी तिथेच जात आहे.
मग ते गावा गावातुन कच्च्या रस्त्याने, लहान मोठ्या वाटेने मला सड्यावर (डोंगरावर असलेली सपाट जागा) घेऊन गेले. तिथे अक्षरशः एक गाव वसलेलं होतं. एका सरळ रेषेत काठी आणि ताडपत्री वापरून छोटी छोटी घरं बनवलेली होती. एक किचन आणि एक हॉल असतो एवढी जागा. किचन मध्ये चुल आणि तीन दिवसाचे राशन. बाहेर मोकळी जागा. लाईट, पाण्याची सर्व सोय तिथे केलेली होती. गुरं एका बाजुला बांधलेली होती. लहान मुलं क्रिकेट खेळत होती. तरुण मुलं लाईट वगैरे लावणे किंवा इतर कामं करत होती. आणि वयस्कर लोक मस्त आराम करत गप्पागोष्टी करत होते. एकुण अशी सर्व लगबग या तात्पुरत्या वसवलेल्या गावात चालू होती. ही जागा चिंदर गावच्या वेशी बाहेर आहे.
तिथल्या लोकांशी गावपळण या प्रथे बद्दल विचारलं असता ते म्हणाले एरव्ही गजबजलेलं आमचं गाव रवळनाथाने कौल दिल्यानंतर रिकामी होऊ लागतो. तीन वर्षांतून एकदा तीन दिवसांसाठी चिंदर गाव निर्मनुष्य केलं जातं. ग्रामस्थ आपापली गुरं ढोरं, पाळीव प्राणी पक्षी घेऊन गावा बाहेर पडतात. दैवी गोष्टी जरी असल्या तरी यामागे शास्रीय कारण देखील सांगितले जाते.
कोरोना काळात प्रत्येक गाव जसं बंद करण्यात आलं होतं तसंच गावातील वातावरण प्रदुषण मुक्त करण्यासाठी गाव रिकामी केलं जातं. त्याच सोबत तात्पुरत्या बांधलेल्या गावात लोक एकत्र भोजन, भजन, खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम करून सहजिवन अनुभवतात. याने एकोपा वाढतो. जुनी भांडणं मिटतात. या तीन दिवसांत महीला देखील रोजचे कामकाज आटपून संध्याकाळी फुगडी वगैरे असे पारंपारिक खेळ खेळतात. कामानिमित्त बाहेर गेलेले चाकरमानी सुद्धा या गावपळणला आवर्जून उपस्थित राहतात.
तीन दिवसांनंतर चौथ्या दिवशी रवळनाथाला पुन्हा कौल लाऊन सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी जातात. सोबत असतात त्या गावपळण वेळच्या सहजीवनात घालवलेल्या आठवणी.
ही प्रथा कधी चालु झाली, का चालु झाली हे नक्की कोणाला माहीत नाही. पण परंपरा जपणाऱ्या या कोकणात ही प्रथा बऱ्याच पिढ्यांपासून सुरू आहे आणि पुढची पिढी सुद्धा ही परंपरा अशीच चालू ठेवेल हे नक्की.
👍 Follow: Unexplored Konkan
👤 Facebook:
/ unexploredkonkan
📷 Instagram:
/ unexploredkonkan
🎥 KZitem:
/ @unexploredkonkan
🖱️ Website:
www.unexploredkonkan.in
Contact: 9970683669 Mady Velkar
Негізгі бет चिंदर गावातील गावपळण | ३ दिवस गावा बाहेर राहण्याची कोकणातील एक आगळीवेगळी प्रथा | कोकणातील गावपळण
Пікірлер: 49