Title - Shree Kalbhairav Varad Stotra
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।
विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।
नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।
ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।
नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।
स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।
थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।
करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।
पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।
नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।
तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।
सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।
गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।
स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।
नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।
आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।
हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।
हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।
कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।
तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।
कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।
हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।
तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।
ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।
तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।
ती सांगतों सर्वासीं । म्हणे मिलिंदमाधव ।।13।।
सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।
चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें ।।14।।
ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।
सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें ।।15।।
ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।
" देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे "।।16।।
तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।
आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।
मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।
माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।
ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।
म्हणाले," हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।
मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।
मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।
मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।
केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।
अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।
स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें "।।22।।
झालें, ऐसें जुंपलें भांडण । " मीच श्रेष्ठें " म्हणती दोघेजण ।
शेवटीं " वेदांसी विचारूं आपण "। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।
ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।
यांच्याशीं केला वादविवाद । " श्रेष्ठ देव कोण असे ? "।।24।।
ऋग्वेद म्हणे " ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।
ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे "।।25।।
यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।
यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।
साम म्हणे " ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।
ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो " ।।27।।
अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे " जो भक्तांचे दु:ख करी दूर।।
तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी " ।।28।।
वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।
दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।
तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।
म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।
तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।
दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।
दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।
त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।
हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।
दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।
वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।
त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।
ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।
कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।
दुष्टांचे करी तो दमन । यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।।
भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।
’कालराज’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।
पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।
अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।
ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।
माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।
मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।
भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।
ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।
भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।
डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्यासारखे।।41।।
मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।
ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।
तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।
आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।
नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।
दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।
देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।
श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।
शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।
मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।
अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।
त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।
Негізгі бет कालभैरव वरद स्तोत्र | ज्याघरात हे स्तोत्र ऐकल जाते तिथे दरिद्रता भूत-प्रेत, चिंता व रोग कधी होत नाही
Пікірлер: 6