प्रिय मनोज जरांगे पाटील यांस पत्र
दि. १९/१०/२०२३
प्रिय मनोज जरांगे पाटील
मु. पो. अंतरवाली सराटी
स. न. वि. वि.
पत्र लिहिण्यास कारण की तुमची समाजाबद्दलची तळमळ आणि कळकळ पाहून मी अतिशय भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव-भगिनी आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पहात आहेत. आपण जो या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे त्याने संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. आपल्या या प्रामाणिक कार्याला माझा सलाम. आज जेव्हा मी या समाजाकडे तटस्थ भूमिकेतून पाहतो तेव्हा मला अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा होतो. एकेकाळी संपूर्ण देशाची राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्यांनी चालवली त्या समाजाची इतकी दयनीय अवस्था कशी झाली? आजही माझा कुणबी शेतकरी स्वतःच्या भाकरीतील अर्धी भाकर बांधावर येणाऱ्या कोणालाही देतो. तो कनवाळू आहे. दयाळू आहे. परंतु त्याचबरोबर तो अतिशय कणखर देखील आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून तो अन्याय सहन करत आहे. परंतु आता या समाजातील तरुण-तरुणींना हा अन्याय दूर झाला पाहिजे असे प्राकर्षाने वाटत आहे. आणि म्हणूनच हा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. प्रिय मनोज जरांगे पाटील यानिमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. तुम्ही या पिचलेल्या, अभावग्रस्त समाजाला आरक्षण तर मिळवून द्याच. तो त्यांचा हक्क आहे. पण त्याबरोबरच त्यांच्या ह्या दुरावस्थेची कारणे देखील सांगा.
महाराष्ट्रातील मराठा समाज हा प्रथम कुणबी आहे व नंतर तो मराठा आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. परंतु हा समाज आजही अनेक अनिष्ट चालीरीती व प्रथा परंपरांमध्ये अडकून पडलेला आहे. तुम्ही एवढे मात्र नक्की करा की या समाजाला मिथ्या अभिमानातून बाहेर काढा. पाटीलकी व देशमुखीचा थाट भिरकावून द्यायला सांगा. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साथ करायला सांगा. आणि त्याचबरोबर हेही सांगा की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून सर्वांगीण विकासासाठी, उत्थानासाठी आहे. वरचेवर हे शासन खाजगीकरण-कंत्राटीकरणाकडे वळत आहे. या तरुणांना किती शासकीय नोकऱ्या मिळतील हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा पुढील आंदोलन हे खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळवण्यासाठी करावे लागणार याचीही जाणीव त्यांना करून द्या. आज तुम्ही या प्रचंड जनसमुदायाचा बुलंद आवाज झाले आहात. या तुमच्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब यांचा शिक्षणाचा मंत्र ह्या पोरापोरींना द्या. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना द्या. बहुजनांच्या पोरांनी कोणाच्याही चिथावणीला बळी पडून भांडणे, मारामाऱ्या किंवा दंगे करू नका असेही त्यांना सांगा. एकूणच मारामाऱ्या व दंग्यांमध्ये बहुजनांचीच डोकी फुटत असतात. हे वास्तव त्यांना पटवून द्या. आंदोलनात आणि एकूणच बहुजन समाजात फूट पाडण्यासाठी हे प्रस्थापित धेंडं कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणून त्यांना तुमच्यासारखे शांत व संयमी राहण्यास सांगा. वेळीच जागे राहण्यास सांगा. कोणत्याही बुवा-बाबाच्या नादी लागून आपली शक्ती, वेळ व पैसा वाया घालवू नका असेही त्यांना आवर्जून सांगा.
प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजातील तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. केवळ नोकरीवर विसंबून न राहता उदरनिर्वाहासाठी कोणत्याही कामाची लाज न बाळगता ताठ मानेने त्यांना जगण्यास सांगा. भ्रष्टाचाराने आपल्या समाजाचे अतोनात नुकसान केले आहे. तेव्हा मराठा तरुण-तरुणींनी कधीही कोणताही भ्रष्टाचार करू नये असे त्यांना जरूर सांगा. संत तुकाराम महाराजांनी व्याज-बट्ट्याच्या व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. याचीही आठवण तुम्ही या आपल्या समाजाला करून द्या. लग्नात किंवा इतर समारंभात शेती गहाण ठेवून किंवा विकून कुवत नसताना खोट्या अभिमानासाठी वारेमाप खर्च करू नका असेही त्यांना सांगा. आपण सर्वजण वारकऱ्यांची लेकरं. तेव्हा आपल्या अख्या महाराष्ट्राचा एकच उभा देव तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तेव्हा एवढे त्यांना जरूर सांगा की इतर कोणाचीही भीती किंवा भक्ती बाळगू नका. पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांना कधीही काहीही मागत नाही. तो उपवास व कर्मकांड करावयास सांगत नाही. पाटील तुम्ही हे आपल्या माता-भगिनींना कळकळीने जरूर सांगा की कठोर उपवास करून रक्तातील हिमोग्लोबिन कमी करून घेण्याची अजिबात गरज नाही. दैववाद सोडून कर्मवादावर विश्वास ठेवा. मराठा तरुणांनी कोणत्याही व्यसनाला शिवू नये असे मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना दटावून सांगा.
पाटील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या समाजाला कुणब्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आता तर आपण कुणबी असल्याचे हजारो पुरावे जमा करण्यात आलेले आहेत. एवढेच काय आपले राजेही कुळवाडी भूषण आहेत. तेव्हा आपण कायद्याच्या चौकटीत नक्कीच बसू. परंतु आपल्या समाजाचे हे सर्व प्रश्न आरक्षणाने सुटतील का याचाही विचार करण्यास जरूर सांगा. आरक्षण आपला अधिकार आहे. सामाजिक न्यायासाठी ते आवश्यक आहे. परंतु समाजातल्या मूळ प्रश्नांकडे देखील आपण पाहिले पाहिजे अशी जाणीव तुम्ही करून द्या. हे मात्र तुम्ही नक्की सांगा की आपआपसात द्वेष, मत्सर, आकस, खेकडा वृत्ती न ठेवता तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही वृत्ती वाढीस लावा. निराशेच्या गर्तेत चाललेल्या सुनील कावळे सारख्या मराठ्यांना आत्महत्या हा पर्याय होऊच शकत नाही हे मात्र आवर्जून सांगा. पाटील शेवटी मात्र एक नक्की सांगा तुमच्यासारखा प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, संयम, अभ्यासूवृत्ती, समाजासाठीची तळमळ ही प्रत्येक मराठा तरुण-तरुणींनी अंगीकृत करून स्वतःच्या समाजासाठीच नव्हे तर तमाम बहुजन समाजासाठी कार्य करावे. प्रत्येक मराठा तरुण-तरुणीने मनोज जरांगे पाटील व्हावे.
Негізгі бет प्राध्यापकाचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र Letter to Manoj Jarange Patil
Пікірлер: 184